सोलापूर : कडाक्याच्या थंडीत हिरवाईने दाट धुक्याची चादर पांघरल्याचा अद्भुत आविष्कार १९ डिसेंबर २०१८ रोजी सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाला. तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. त्यात वारेही वाहत होते. धुक्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत असून, दाट धुकेही पडू लागले आहे. या धुक्यामुळे अगदी पावलाच्या अंतरातीलही काही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना सकाळी नऊ वाजेपर्यंत दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके टिकून राहिल्यामुळे महाबळेश्वर व माथेरानचा ‘फील’ मिळाला; मात्र शेतीसाठी हे धुके धोकादायक आहे. दाट धुके पडल्यामुळे फळबागा व फळभाज्यांच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. धुक्यातील पाणी आणि त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे द्राक्षबागेत घडकूज होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच डाळिंब बागेतही फळांवर डांबऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या फळबागा व फळभाज्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत.
मेंढापूर येथील शेतकरी उमेश यादव म्हणाले, ‘दाट धुक्यामुळे द्राक्षबागांमध्ये घडकूज होण्याचा मोठा धोका असल्यामुळे आम्ही आमच्या बागेत सल्फरचे डस्टिंग करून बागेत पहाटेच शेकोट्या पेटवून धूर करून बागेचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला.’